शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग

कोकणभागातील शाळांसाठी व विद्यार्थ्यांसाठी सुमारे तीन दशके सातत्याने 'कोकण अभ्यासवर्ग' या शीर्षकाखाली होणारे उपक्रम हे केवळ 'विद्यार्थी' ह्या  केंद्रबिंदूभोवती योजलेले होते. त्याच्या पुढची पायरी आणि पुर्वीपासूनच शिक्षक प्रशिक्षणाच्या मुद्द्यावर आग्रही राहिलेल्या स्व. एस्. वाय. गोडबोले गुरुजी व ज्ञान प्रबोधिनीचे स्व. अप्पा पेंडसे यांच्या विचारसूत्रीनुसार 'चतुरंग प्रतिष्ठान'ने शिक्षकांच्या 'प्रशिक्षण वर्गा'चे पाऊल उचलले.  या विचाराला ठोस जोड लाभली ती, 'सर्वोत्तम शिक्षकांची निपज ही राष्ट्राची प्राधान्य गरज असल्याच्या' मा. पंतप्रधानांच्या प्रतिपादनाची!! वस्तुस्थिती जाणवली की, शिक्षकी पेशात प्रवेश केलेल्यांचे पुस्तकी शिक्षण उत्तम झालेले असले, तरी 'शिक्षकत्वा'ची सर्वोत्तम तत्वे त्यांच्यात उतरलेली असतातच असे नाही. ती विशेष अभ्यासाने, तपस्येने, खास प्रयत्न करून आत्मसात करावी लागतात, ज्यामुळे शिक्षकामधे उत्तम प्रतीचे 'शिक्षकत्व' येऊ शकते. हा सर्वोत्तम शिक्षकत्वाचा उद्देश नजरेसमोर ठेवून, शिक्षण क्षेत्रात गेली पन्नासहून अधिक वर्षे, विविध शैक्षणिक प्रयोग यशस्वी करणाऱ्या पुण्याच्या 'ज्ञान प्रबोधिनी'च्या सहयोगाने, चतुरंग प्रतिष्ठानने 'शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग' या आपल्या नव्या उपक्रमाची योजना केली. या सकारात्मक प्रयोगवादी प्रशिक्षण वर्गातून, 'मी शिक्षक म्हणजे 'एक नोकरदार' नसून, विद्यार्थी (पर्यायाने समाज) घडविणारा 'एक शिल्पकार' आहे अशी उच्च-उदात्त भावना बाळगणारे, खरोखरच मला माझे विद्यार्थी 'घडवायचे' आहेत ही प्रामाणिक धारणा ठेवणारे, त्यासाठी स्वतः सर्वोकृष्ट शिक्षक बनण्याची आत्मप्रेरणा जगविणारे  शिक्षक निर्माण होतील. अशी जडण-घडण झालेल्या शिक्षकांची एक मजबूत साखळी तयार होऊन, ती उद्याच्या भावी पिढयांची तारणहार ठरेल' असा ठाम विश्वास चतुरंग प्रतिष्ठान व ज्ञान प्रबोधिनीला वाटला आणि या 'शिक्षक प्रेरणा जागृती वर्गा'चे ठोस पाऊल पडले.